हसतं-खेळतं कुटुंब एका रात्रीत संपलं; शेअर बाजाराच्या फटक्याने उद्ध्वस्त झाला संसार
स्टार माझा न्यूज, बार्शी (प्रतिनिधी) – दिनांक : 12 जून 2026
एकाच कुटुंबाच्या मृत्यूने गावात खळबळ
सोलापूर जिल्ह्यातील वैराग परिसरातील हात्तीज गावात अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. शेअर बाजारातील मोठ्या आर्थिक नुकसानीच्या नैराश्यातून एका व्यक्तीने पत्नी व दोन मुलांना विषारी आळीनाशक औषध देऊन त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मृतांची नावे
मिळालेल्या माहितीनुसार, योगेश बाळासाहेब पाटील (वय ४१), पत्नी माधुरी योगेश पाटील (वय ३७) तसेच मुलगे अर्थव (वय ११) आणि शिवांश (वय ९) यांचा या दुर्दैवी घटनेत मृत्यू झाला आहे.
सकाळी उघडकीस आली घटना
सकाळी सुमारे सात वाजले तरी घराचा दरवाजा न उघडल्याने नातेवाईक महेश पाटील यांनी घराकडे धाव घेतली. वारंवार आवाज देऊनही प्रतिसाद न मिळाल्याने शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडण्यात आला. घरात प्रवेश करताच समोर आलेले दृश्य पाहून सर्वजण हादरून गेले.
घरात दिसले भीषण चित्र
घरामध्ये योगेश पाटील यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. तर पत्नी माधुरी पाटील आणि दोन्ही मुले मृत अवस्थेत पडलेली होती. प्राथमिक माहितीनुसार, खाण्याच्या पदार्थातून विषारी आळीनाशक औषध देण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
शेअर बाजारातील कोट्यवधींचे नुकसान
फिर्यादीत नमूद केल्यानुसार, योगेश पाटील यांना शेअर बाजारातील व्यवहारांमध्ये सुमारे १ कोटी ८१ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले होते. या मोठ्या आर्थिक धक्क्यामुळे निर्माण झालेल्या नैराश्यातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
पोलीस तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच वैराग पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
परिसरात शोककळा
हात्तीज गावातील एकाच कुटुंबाचा झालेला दुर्दैवी अंत नागरिकांना हादरवून टाकणारा ठरला आहे. गावात शोककळा पसरली असून, सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क: रियाज पठाण – 9405749898 / 9408749898







