परंडा, ता. २५ एप्रिल (प्रतिनिधी) : गोरख देशमाने
परंडा व तुळजापूर परिसरातील ड्रग्ज तस्करी प्रकरणात भाजपाचे माजी आमदार सुजितसिंह ठाकूर व माजी आमदार राहुल मोटे यांनी जातीने लक्ष घातले आहे. दिनांक २५ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता परंडा येथील भाजपा संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, परंडा व तुळजापूर येथे सुरू असलेल्या ड्रग्ज तस्करीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधला आहे. यावेळी ठाकूर यांनी परंडा व तुळजापूर येथील भीषण वास्तव आणि ड्रग्ज तस्करीची सद्यस्थिती मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर मांडली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ड्रग्ज तस्करीचा बीमोड करण्याचे आदेश दिल्याचे ठाकूर यांनी पत्रकारांना सांगितले.
यानंतर ठाकूर यांनी सोलापूर व धाराशिव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांच्याशी संपर्क साधून पुढील कार्यवाहीस गती दिली आहे. त्यांनी तुळजापूर व परंडा या दोन्ही ठिकाणी ड्रग्ज प्रकरणात विशेष लक्ष घालून पाठपुरावा सुरू केला आहे.
बार्शीमध्ये उघड झालेल्या ड्रग्ज तस्करी प्रकरणात १० आरोपी निष्पन्न झाले असून त्यापैकी ८ आरोपी परंडा येथील व २ आरोपी बार्शी येथील आहेत. बार्शी पोलिसांनी आतापर्यंत ७ जणांना अटक केली असून ३ आरोपी फरार आहेत. तुळजापूर येथे ३६ आरोपी निष्पन्न झाले असून १४ जणांना अटक करण्यात आली आहे तर २२ जण फरार आहेत.
परंडा येथे असद हसन देहलुज, मेहफुज महंमद सय्यद, वसीम इसाक बेग, जावेद नवाबुद्दीन मुजावर आणि हसन चाऊस या पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच जमीर अन्सार पटेल व सिरफराज उर्फ गोल्डी अस्लम शेख यांचा समावेश आहे. उर्वरित तीन आरोपी फरार असून त्यांच्या नावांची माहिती गोपनीय ठेवण्यात आली आहे.
१८ एप्रिल रोजी २० ग्रॅम वजनाच्या १० ड्रग्ज पुड्यांसह पोलिसांनी तिघांना अटक केली होती. पुढील तपासात असद देहलुजकडे ९.१९ ग्रॅम ड्रग्ज पुड्या व गावठी पिस्तुल, महफुज सय्यदकडे ५.७३ ग्रॅम ड्रग्ज व दोन पुड्या तर सिरफराज उर्फ गोल्डी याच्याकडे ५.१२ ग्रॅम ड्रग्ज व तीन पुड्या जप्त करण्यात आल्या.
ड्रग्ज कुठून आणले गेले, कोणाला विकले जाणार होते, पुरवठादार कोण आहेत, तसेच जप्त गावठी पिस्तुल इतर कोणत्या गुन्ह्यांत वापरले गेले आहे का याचा तपास सुरू आहे. आरोपींचे मोबाईल कॉल डिटेल्स, सोशल मीडिया आदींचीही सखोल तपासणी केली जात आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नाकुल व पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर व त्यांच्या पथकाने केली आहे.
“या प्रकरणात कोणालाही गय केली जाणार नाही,” असे ठाम प्रतिपादन माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत केले.
या पत्रकार परिषदेला भाजपा तालुकाध्यक्ष अरविंद रगडे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. झहीर चौधरी व किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष ॲड. संतोष सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:
संपादक रियाज पठाण – ९४०५७४९८९८ / ९४०८७४९८९८
