बार्शी शहरातील प्रमुख रस्त्यांकरिता 89 कोटी, 57 लाख रुपयांचा निधी मंजूर — आमदार राजेंद्र राऊत

Picture of starmazanews

starmazanews

www.starmazanews.com संपादक रियाज पठाण 9405749898/9408749898

बार्शी नगर परिषदेच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षांमध्ये आमदार राजाभाऊ राऊत यांच्या नेतृत्वाखाली करोडो रुपयांची विकास कामे करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने शहरातील व विस्तारित भागातील अंतर्गत रस्ते, गटारी, दिवाबत्ती, पाणीपुरवठा योजना, भुयारी गटार योजना, सर्व समाजाच्या स्मशानभूमी सुधारणा, समाज मंदिरांचे सभागृह, भगवंत मैदानाचे नूतनीकरण, व्यापारी संकुले, छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवसृष्टी, महिला भगिनींसाठी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी स्वच्छतागृहे व शौचालय, तसेच बार्शी शहरात उन्हाळ्यातील पाणीटंचाईच्या काळात शासकीय विहिरी मधून पाणी पुरवठा करण्यासंबंधीची योजना, घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छता व्यवस्थापन, माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत शहराचे सौंदर्य खुलविणे, त्याचप्रमाणे अमृत योजना अशा अनेक योजनेतून हजारो कोटींचा निधी बार्शी शहरात प्राप्त झाला व त्या माध्यमातून बार्शी शहराचा चेहरा-मोहरा बदलण्याचा प्रयत्न आमदार राजाभाऊ राऊत यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असणाऱ्या नगर परिषदेच्या माध्यमातून करण्यात केला.

हे विकास कामे होत असताना बार्शी शहरासाठी महत्त्वकांक्षी असलेली महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान रस्ते विकास प्रकल्प अंतर्गत 89 कोटी 57 लाख रुपयांचा निधी बार्शी शहरासाठी मंजूर झाल्याची माहिती आमदार राजाभाऊ राऊत यांनी मुंबईतून दिली. ज्यामध्ये बार्शी शहरातील विविध भागातील प्रमुख अकरा रस्त्यांचा समावेश आहे.

या योजनेस मंजुरी मिळून निधी उपलब्ध होण्यासाठी गेली अडीच वर्षांपासून आमदार राजेंद्र राऊत प्रयत्न करीत होते, परंतु बार्शीतील काही मानसिक दृष्ट्या कावीळ झालेले नेते यास विरोध करून अडचण निर्माण करीत होते. त्यामुळे हा प्रकल्प रखडला होता, याबाबत आमदार राजाभाऊ राऊत यांनी वेळोवेळी पत्रकार परिषदेत माहिती देऊन विरोधकांना या कामात खोडा न घालण्याची विनंती केली होती. राजकीय विरोधकांच्या या खोड्यामुळेच बार्शीकर नागरिकांची गैरसोय होत होती.

परंतु मागील 25 दिवसांत राज्यातील सत्तांतर झाल्यानंतर आमदार राजाभाऊ राऊत यांनी पुन्हा नव्या जोमाने या योजनेचा पाठपुरावा करून मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब मा. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे पाठपुरावा सुरू ठेवला व ही योजना मंजूर करून घेऊन बार्शी शहरातील नागरिकांसाठी ही महत्त्वाकांक्षी योजना समर्पित केली.

ही महत्वकांक्षी योजना मंजूर केल्याबद्दल मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व मा. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे बार्शीकर जनतेच्या वतीने आमदार राजाभाऊ राऊत यांनी आभार मानले.

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!